Wednesday, May 22, 2024
Homeआरोग्यआला पावसाळा, विजेला सांभाळा ! -विकास पुरी

आला पावसाळा, विजेला सांभाळा ! -विकास पुरी

          मान्सून वेशीवर आलाय. दोन दिवसांत पावसाळा सुरु होईल. त्यामुळे पावसाळ्यात जशी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तशी आपण विजेची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. कारण विजेबाबतचा निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास एखाद्याच्या जिवावर बेतू शकतो. मोबाईल प्रमाणे विजेचे नाही. ही यंत्रणा चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागतेच. एका ठिकाणी बसून ही सेवा चालू अथवा बंद करता येत नाही. रात्री-अपरात्री गेलेली वीज आपोआप येत नाही. त्यासाठी कोणीतरी भर पावसात किंवा अंधारात जीवाची जोखीम पत्करुन खांबावर चढलेला असतो. तेंव्हा कुठे ही वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर निव्वळ दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुत समजून घेतली पाहिजे. कारण गेलेली वीज पुन्हा येईल… पण गेलेला जीव पुन्हा येणार नाही.

            विविध स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होवून त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. तर कधी हा बिघाड एखाद्या गावापुरता किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो.

              पावसाळ्याच्या सुरूवातीला वादळ-वारा व आकाशातील विजेचा कडकडाट सर्वांनीच अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्ही मध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.

             दुसरी बाब म्हणजे वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम झालेले असतात. त्यातच त्यावर पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे  वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जिवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते. एक प्रकारे हा बेकर वीज यंत्रणेचा सुरक्षा कवचच असतो.

बिघाड शोधणे आव्हानात्मक

   

          जेंव्हा-केंव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. हा बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात. तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो. बिघाड शोधणे हेच मुळी जिकीरीचे, वेळखाऊ व कौशल्याचे काम आहे.


चूकीला माफी नाही 

           चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच जनमित्राला खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारच्या काळज्या घेवूनही वीज कर्मचारी प्राणांकित अपघातात बळी पडल्याच्या घटना अधून-मधून घडतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की एखाद्याच्या जीवनाचे मोलही आपण ध्यानात घेत नाहीत, असो. तर वीज जाते अन् येते या दरम्यान काय होते ? याचा विचार आपण जेंव्हा करु त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाहीत हे नक्की.

व्यक्तीला नको ‘टोल फ्री’ला फोन करा.

         वीजपुरवठा खंडित झाल्यास ५ ते १० मिनिटे थांबून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकाला फोन करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने १९१२, १८०० २३३ ३४३५ व १८०० १०२ ३४३५ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यामार्फत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. टोल फ्री क्रमांक वीजबिलावर छापलेले असतात. महावितरणच्या मोबाईल अँँपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात.

            वीजपुरवठा बंद ठेवून जनक्षोभ ओढवून घेणे कोणालाही परवडणारे नसते. पण नैसर्गिक आपत्तीपुढे मानवी प्रयत्न तोकडे पडतात. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी त्यांचे शर्थीचे प्रयत्न करत असतातच. अशा संकटकाळी आपण माणूस म्हणून त्यांना समजून व सबुरीने घेतले पाहिजे…इतकेच.

विकास पुरी,

जनसंपर्क अधिकारी, महावितरण

कोल्हापूर परिमंडल


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय