Saturday, April 27, 2024
Homeकृषीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी एल्गार!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी एल्गार!

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन

मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकार व वीज विधेयक प्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने अखिल भारतीय पातळीवर २६ जानेवारी २०२३ रोजी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. हरियाणातील जिंद येथे २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन देशव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित करून देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.

डॉ. ढवळे म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर रस्त्यावर उतरत आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चात सामील संघटनांची महत्त्वपूर्ण ऑनलाइन बैठक दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली. शेतकरी सभेचे ज्येष्ठ नेते प्रा.एस. व्ही. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात २५ जानेवारी रोजी जोरदार आंदोलन करण्याचा  निर्णय घेण्यात आला.  

राज्यातील शेतकरी, खरीप हंगाम वाया गेल्याने संकटात सापडले आहेत. राज्यात यंदा शेतकऱ्यांनी १ कोटी ४१ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी केली होती. गोगलगाईचा प्रादुर्भाव, वाणी आळीचा हल्ला, येलो मॉझ्याक व अति पाऊस, या साऱ्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या पिकांवर परतीच्या पावसाने मोठा आघात केला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पहिल्याच टप्प्यात राज्यातील २९ लाख हेक्टर पिके पावसाने मातीमोल केली. एकूण नुकसान पाहता राज्यभरात ४० लाख हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. हे नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. विविध संघटनांनी आंदोलने करूनही सरकारने राज्यात ओला दुष्काळ लागू केला नाही. घोषणा केल्या मात्र अदयापही मदत दिली नाही. शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्यात दोनदा कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या. मात्र धरसोडीचे धोरण व जाचक अटीशर्तींमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. पीक विमा योजना, जमीन अधिग्रहण, वनाधिकार, अन्न सुरक्षा, पेंशन, शेतीमालाचे भाव, दूध एफ.आर.पी., यासारखे प्रश्न महाराष्ट्रात तीव्र झाले आहेत. शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने व मिळकत घटत असल्याने राज्यातील शेतकरी नैराश्याने आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचे व श्रमिक जनतेचे प्रश्न तीव्र होत असताना राज्यातील भाजप-शिंदे सरकार महापुरुषांचा अवमान, धार्मिक द्वेषाचे मुद्दे उपस्थित करून शेती, शेतकरी व श्रमिकांचे प्रश्न अडगळीत पडावेत यासाठी नियोजनबद्ध कारस्थाने करत आहे.  

राज्यातील संयुक्त किसान मोर्चाने या पार्श्वभूमीवर दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी राज्यभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आंदोलनाच्या तयारीसाठी झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये डॉ. अशोक ढवळे, प्रा. एस. व्ही. जाधव, हिरालाल परदेशी, उल्का महाजन, सुभाष काकुस्ते, सुभाष वारे, ब्रायन लोबो, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, राजू देसले, उमेश देशमुख, किसन गुजर उपस्थित होते. प्रतिभा शिंदे, मेधा पाटकर, किशोर ढमाले यांनीही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटना, शेतकरी नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांना जोडून घेत आंदोलन व्यापक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.    

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय