मुंबई : शालेय पोषण आहार कामगार संघटना राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत आज (दि.३१) रोजी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्रीय किचन पध्दती बंद करून पुन्हा पुर्वीच्या बचत गटांना आणि कामगारांना काम द्यावे. मदतनीस यांचे अन्यायकारक, अधिकचे काम कमी करावे उदा : सर्व शाळा परिसर सफाई आणि वर्ग खोल्या सफाई, संडास बाथरुम साफ करण्याचे काम रद्द करुन स्वयंपाकाशी संबंधित तेवढेच काम निश्चित करावे. या संबंधित शासकीय आदेश बदलून, सुधारित आदेश काढला जावा. मदतनीस मानधन दहा महिने ऐवजी बारा महिन्यांचे दिले पाहिजे. विहित प्रक्रिया पूर्ण न करता, बेकायदा कामावरून कमी केलेल्या कामगारांना तात्काळ हजर करून घ्यावझ, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शालेय पोषण आहार कामगार संघटना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य कॉ. ए. बी. पाटील, सरचिटणीस कॉ. डाॅ.अशोक थोरात, राज्य खजिनदार काॅ. मिरा शिंदे, राज्य कमिटी सदस्य श्रीमती कुसुम देशमुख, कॉ. लता खेपकर यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून काही प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास संघटनांच्या पदाधिकारी व्यक्त केला आहे. तसेच शिक्षण सह सचिव प्रमोद पाटील यांच्याशी देखील शिष्टमंडळाने चर्चा केली.