जुन्नर : गारपिटीत हिरडा पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या, अशी मागणी बिरसा ब्रिगेड च्या वतीने नायब तहसीलदार संजय असवले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस चालू आहे.या आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीतील अनेक पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. आबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मागील अनेक दिवस हा अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच भीमाशंकर आणि आहुपे खोऱ्यात गारांचा पाऊस झाल्याने हिरडा या वन उत्पादनाचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी समाजाचे प्रमुख आर्थिक साधन म्हणून हिरडा पिकाकडे पहिले जाते. वर्षातून एकदा येणाऱ्या या पिकावरच आदिवासी समाजाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. त्याचं पिकाचे नुकसान झाल्याने आदिवासी समाज हवालदिल झालेला आहे.
या सर्वांचा विचार करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लोकांना त्याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा ब्रिगेड मातृशक्ती प्रमुख पुणे जिल्हा उमाताई मते, ताराबाई डामसे, मंगल कवठे, कविता डगळे, अरुणा खमसे व महिला उपस्थित होत्या.