सुरगाणा (दौलत चौधरी) : आपली ग्रामपंचायत कोरोनामुक्त ठेवायची असेल तर सरपंचांनी गाफिल राहून चाल नाही. आपली काळजी आपणच घ्यायला हवी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी वैद्यकीय सेवा संस्था काठीपाडा येथे आयोजित कोविड 19 उपाययोजना प्रतिबंधक आढावा बैठकीत केले.
यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आदिवासी सेवक चिंतामण गावित, तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, काशिनाथ गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, आयुर्वेद तज्ञ डॉ.विक्रांत जाधव, जेष्ठ पत्रकार महेंद्र महाजन, उपसभापती इंद्रजीत गावित, सदस्य एन.डी.गावित, डॉ. विनय कुमावत, डॉ. वसंत गावित, सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे हे उपस्थित होते.
यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करतांना बनसोड म्हणाल्या की, लोक सरकारी रुग्णालयात उपचार का घेत नाहीत. सरकारी डाॅक्टरांवरचा विश्वास का उडाला आहे, याचा गांभीर्य पुर्वक विचार करुन चांगल्या कर्तृत्वातून विश्वास संपादन करावा. आज
मानसाचे दैनंदिन आयुष्य एका वर्षात खुप बदलले आहे. कोरोना वास्तव भयंकर असल्याने गावातील नागरिकांनी पुढे येऊन आपल्या गावाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. याकामी सरपंच, पोलीस पाटील यांनी विशेष लक्ष द्यावे. लग्न समारंभ, अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. शासनाकडील यंत्रणा आता तोकडी पडते आहे. पोलिसांना कारवाई करण्याची वेळच शासनावर येऊ देऊ नका. गावानेच जबाबदारी उचलायची आहे.
खुंटविहीर, गोंदुणे, रघतविहीर या गावातील दुध संकलन केंद्रावर गर्दी होऊ देऊ नका. तसेच पेठ, सुरगाणा तालुक्याच्या वाटेला आलेला लसीचा वाटा दुसरीकडे वळविण्यात येणार नाही. लसीचा पुरवठा देशपातळीवरच कमी आहे. तो सुरळीत झाल्यावर अठरा ते चव्वेचाळीस वयोगटाला लस देण्यात येईल. पांगारणे येथील आरोग्य केंद्रावर मी स्वतः मागील दौ-यात आदेश देऊनही लसीकरण सुरु करण्यात आले नाही. यावर माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही ? असे खडे बोल प्रशासनाला सुनावले.
यावेळी सिताराम पवार यांनी उंबरठाण येथील रिक्तपदे भरण्याची मागणी केली. तसेच कोरोना लसीकरणा बाबत आदिवासी बोली डांगी व कोकणी भाषेत जनजागृती करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांनी जनतेला केलेले आवाहन याचे सादरीकरण करण्यात आले. याबाबत शिक्षक कोविड काळात करीत असलेल्या कामाचे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले.
यावेळी राजेंद्र पवार, माधव पवार, नवसू गायकवाड, तुकाराम देशमुख, बाळू तात्या, आनंदा झिरवाळ, धर्मेंद्र पगारीया, हेमंत वाघेरे, नितीन चौधरी, सखाराम गावित, परशुराम शेवरे, परशराम चौधरी, चंदर भोये, गोपीनाथ देशमुख, हरी चौधरी, रामदास केंगा, राजेंद्र गावित, हिरामण चौधरी, एकनाथ बिरारी हे उपस्थित होते.