ठाणे : रेशन, रोजगार, पाणी, वीज, आरोग्य अशा अत्यंत प्राथमिक मुद्द्यांवर आज 26 मे रोजी जनवादी महिला संघटनेच्या ठाणे-पालघर जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र निदर्शने करण्यात आली. ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, अशा विविध तालुक्यांतून 1500 महिला या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.
दोनच दिवसांपूर्वी 24 मे रोजी जमसं च्या 12,000 महिलांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत त्यांस घेराव घातला होता.
ठाणे शहरात तब्बल 2 तासभर उन्हात घोषणा देत उभे राहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेला पाचारण केले. वरील सर्व विषयांचे अधिकारीही चर्चेला बोलावले. चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. रेशनशी संबंधित अनेक प्रश्न, पाण्याचे टँकर पोचवणे, रोजगार हमी योजनेची कामे, आरोग्य केंद्रातील विविध सुविधा अशा अनेक प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले चर्चेला आवर्जून उपस्थित होते.
शिष्टमंडळात लहानी दौडा, प्राची हातिवलेकर, सुनिता शिंगडा, निकिता काकरा, कमल वळंबा, दीपिका अंधेर, नंदिनी म्हसकर, कमला गट्टू, बेबी नंदा गायकवाड, कविता वरे, ज्योती तायडे, तसेच राज्य उपाध्यक्ष सोन्या गिल आणि हेमलता पाटील यांचा समावेश होता. मुंबई जिल्ह्यातील जमसं नेत्या रेखा देशपांडे, सुगंधी फ्रांसिस, माधुरी बोजगर, आणि रायगड जिल्ह्यातील अमिता ठाकूर, कुंदा पाटील आदींसह उपस्थित होत्या.