उस्मानाबाद(प्रतिनिधी) :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड मोहन शिंदे यांचे काल आजाराने निधन झाले. १९७५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या गावात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पहिले राज्य अधिवेशन झाले. तेव्हापासून ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नेतृत्व केले. पुढे त्यांनी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशने ऑफ इंडिया या युवक संघटनेचे नेतृत्व केले. सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य तसेच किसान सभेचे काम करत होते. शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्याबद्दल प्रचंड कळवळा असलेला एक सच्चा कम्युनिस्ट हरपला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दु:ख व्यक्त केले, ते म्हणाले, पक्षावर त्याची अपार निष्ठा होती. असा कार्यकर्ता आज आपणास सोडून गेला आहे. अत्यंत एकनिष्ठ व मितभाषी स्वभावाच्या कॉम्ररेड मोहन शिंदे यांस भावपूर्ण आदरांजली आणि अखेरचा लाल सलाम! त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व जण सहभागी आहोत.”
डावी चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. भविष्यात चळवळीला पुढे नेणारे हे तरुणच आहेत. म्हणून तरुण विद्यार्थ्यांना चळवळीत आणण्यासाठी सातत्याने काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग नेहमी आयोजित केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह असे, अशी प्रतिक्रिया स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी व्यक्त केली आहे.