Monday, May 20, 2024
Homeग्रामीणसमजून घेऊ - मासिक पाळी

समजून घेऊ – मासिक पाळी

         नुकताच जगभरामध्ये ‘मेंस्ट्रुअल हायजिन डे’ साजरा केला गेला. “वॉश युनायटेड” नावाच्या एका एनजीओने २०१४ पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. दरवर्षी २८ मे ला मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

           आजही आपल्या समाजामध्ये मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. या प्रश्नाकडे इतक्या खासगी पद्धतीने पाहिलं जातं की त्याच्याभोवती लाजेचं एक वलय निर्माण झालं आहे. एखादी गोष्ट जेव्हा लपवली जाते किंवा त्या बाबतीत मोकळेपणाने बोललं जात नाही, अशावेळी अपुऱ्या माहितीमुळे त्या विषयी आपल्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात. म्हणूनच मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याच्या मुळेच आज जगात मानव जात अस्तित्वात आहे. त्यामुळे मासिक पाळी मध्ये लपवण्यासारखं लाजण्यासारखं असं काहीच नाही.

मासिक पाळी म्हणजे काय? 

           साधारणपणे वयाच्या १० ते १६ वर्षाच्या दरम्यान मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात होते. यादरम्यान मुलीचे शरीर हे गर्भधारणेसाठी म्हणजेच बाळाला जन्म देण्यासाठी परिपक्व व्हायला सुरुवात झालेली असते. प्रत्येक महिन्याला शरीर गर्भधारणेकरिता गर्भाशयाला तयार करीत असते. ह्या प्रक्रियेदरम्यान गर्भाशयात स्त्रीबीजाच्या रोपणासाठी पेशी आणि रक्ताचे आवरण तयार होत असते. जेव्हा स्त्रीची गर्भधारणा होते तेव्हा त्या गर्भाच्या सुरक्षित वाढीसाठी हे रक्तपेशींचे आवरण गरजेचे  असते. जर गर्भधारणा झाली नाही तर मासिक पाळीदरम्यान हे आवरण गळून पडते आणि गर्भाशयाच्या मुखातून योनिमार्गाद्वारे हे रक्तपेशींचे आवरण शरीरातून बाहेर पडते. ही क्रिया सरासरी ३-५ दिवसांपर्यंत सुरु राहते.

            मासिक पाळी यायला सुरुवात झाल्यानंतर मुलींच्या शरीरात बरेच बदल होत असतात. या शारीरिक बदलांसोबतच त्या काही मानसिक भावनिक बदलांना सामोरे जात असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. या सगळ्या बदलांविषयी त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे.

हायजिन मॅनेजमेंट प्रॉडक्ट –

             हायजिन मॅनेजमेंट प्रॉडक्टमध्ये आपण मासिक पाळीच्या दरम्यान ज्या वस्तू वापरतो त्यांचा समावेश होतो. जसं की सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप, इत्यादी. आता मुळ प्रश्न असा आहे की किती स्त्रियांना या गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात? किती स्त्रियांना हे सर्व प्रॉडक्ट परवडण्यासारखे असतात? ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’च्या एका अहवलानुसार, भारतातील फक्त ३८ टक्के स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅडचा वापर करतात. तर टेम्पोन किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण हे १-२ टक्के सुद्धा नाही. उरलेल्या ६० टक्के स्त्रिया आजसुद्धा मासिक पाळी मध्ये कापडाचा वापर करतात.

             भारतात मासिक पाळी दरम्यान कापड वापरण्याचे प्रमाण जास्त असण्यामागे काही कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे आजही सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत ग्रामीण भागामध्ये तसेच काही प्रमाणात शहरी भागात सुद्धा बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. जसं की सॅनिटरी पॅड वापरले तर कॅन्सर होतो किंवा मुलं होत नाहीत असे काही गैरसमज आजही काही स्त्रियांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यानंतर दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली समाजरचना पाहता, समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता आजही बऱ्याच स्त्रियांना दर महिन्याला सॅनिटरी पॅडसाठी पैसे खर्च करणे परवडणारे नसते. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया मासिक पाळी दरम्यान कापडाचा वापर करतात.

             जर तुम्ही मासिक पाळीसाठी कापडाचा वापर करत असाल, तर हे कापड वापरताना योग्य ती स्वच्छतेची काळजी घेतली गेली पाहिजे. ते कापड गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुतलं पाहिजे. त्याचे निर्जंतुकीकरण करून ते उन्हामध्ये किंवा कोरड्या हवेत नीट सुकवलं पाहिजे. मात्र बऱ्याचदा ही काळजी घेतली जात नाही. ते कापड कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने कुठेतरी आडोश्याला सुकवले जाते. अशा कापडाच्या वापरामुळे अनेकदा त्वचेला तसेच योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते. सॅनिटरी पॅड वापरताना सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली गेली पाहिजे. संसर्ग टाळण्यासाठी दर ४ तासांनी पॅड बदलणे जरुरीचे आहे. जर तुम्ही टॅम्पॉनचा वापर करत असाल तर ते 6 तासांपेक्षा जास्त वेळासाठी असू नये. मेन्स्ट्रुअल कप हे दिवसातून एकदा किंवा दोनदा बदलले पाहिजेत. तुम्हाला किती रक्तस्त्राव होतो आहे त्यानुसार योग्य उत्पादन वापरणे महत्वाचे आहे. 

मासिक पाळी संबंधित आजार –

           मासिक पाळी दरम्यान अनेक शारीरिक त्रास होत असतात. मात्र बऱ्याचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते त्रास सहन करत राहतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हे त्रास होणं ठीक आहे. पण जर या त्रासामुळे तुम्ही तुमची रोजची काम सुद्धा व्यवस्थित करू शकत नसाल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. कारण आत्ताच शुल्लक वाटणारे हे त्रास भविष्यात गंभीर आजाराचे रुप घेऊ शकतात. मासिक पाळी संबंधित काही आजारांविषयी पुढे माहिती दिली आहे.

१. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम-

              अनेक स्त्रियांमध्ये ही लक्षणे पाळीपूर्वीच्या सात ते चौदा दिवसांमध्ये दिसतात. डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, पोट फुगल्यासारखे वाटणे असे  त्रास जाणवतात. ही सर्व लक्षणे शरीरात संप्रेरकांमुळे होणा-या बदलांमुळे असतात. स्त्रियांना याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास होऊ शकतो.

२. डिस्मेनोरिया-

               मासिक पाळीदरम्यान पेटके किंवा क्रँप येण्याला डिस्मेनोरिया म्हणतात. यामध्ये ओटीपोटामध्ये खूप जास्त वेदना होतात आणि कंबर दुखते. मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे डिस्मेनोरिया. ही समस्या सुमारे ९० टक्के स्त्रियांमध्ये आढळते. गंभीर स्वरूपाचा डिस्मेनोरिया चालूच राहिल्यास त्यातून अनेक धोके उत्पन्न होऊ शकतात.

३. मेनोरेजिया-

                पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात किंवा दीर्घकाळ रक्तस्त्राव होण्यास मेनोरेजिया म्हणतात. यामध्ये मासिक पाळी सात दिवसांपेक्षाही जास्त सुरु राहते आणि रक्तस्त्रावही जास्त होतो. गर्भाशयातील  तंतुयुक्त पदार्थ (युटेराइन फायब्रॉइड्स) अथवा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे मेनोरेजिया होतो.

४. ऍमेनोरिया-

मासिक पाळी न येणे म्हणजे ऍमेनोरिया. काही मुलींना   16व्या वर्ष्यानंतरही पाळी येत नाही.16 वर्षे वयानंतरही पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

          मासिक पाळी संदर्भात याव्यतिरिक्तही बरेच आजार आहेत. जर तुम्हाला अशी काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित स्त्री-रोग तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

स्वछताविषयक सोयीसुविधा –

        आज स्त्रिया शिक्षणासाठी किंवा कामाच्या निमित्ताने  घराच्या बाहेर पडत असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या ऑफिस मध्ये स्त्रियांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध असली पाहिजेत. तसेच त्या ठिकाणी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. आज मात्र याबाबतीत खूपच निराशाजनक चित्र दिसते. बऱ्याच शाळा कॉलेजमधल्या स्वच्छतागृहांची अवस्था खूप वाईट आहे. ग्रामीण भागातल्या काही शाळांमध्ये तर स्वच्छतागृहच उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृह आहेत तर त्यांची साफसफाई योग्य रीतीने केली जात नाही किंवा तिथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. नुकताच आउटलुक या मासिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातील आकडेवारीनुसार आजही भारतातील 51 टक्के शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. आज या प्रश्नावर खूप मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज आहे.

 मासिक पाळी संबंधीचे गैरसमज –

            आजही आपल्या समाजात मासिक पाळी संदर्भात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरलेल्या दिसतात. काही ठिकाणी मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना अपवित्र समजले जाते. त्या चार-पाच दिवसांमध्ये स्त्रियांना बाजूला बसवतात घरातल्या वस्तूंना त्यांना स्पर्श करू दिला जात नाही. काही ग्रामीण भागात तर घराच्या मागे असणाऱ्या पडवीत स्त्रियांना राहावे लागते. गडचिरोली भागात गोंड आणि माडिया आदिवासींमध्ये या बाबतीत एक विचित्र प्रथा पाळली जाते. गाववस्तीच्या बाहेर गवत आणि मातीने बांधलेली एक झोपडी असते. त्या झोपडीला कुरमा म्हणतात. मासिक पाळीच्या दिवसात स्त्रीयांना या झोपडीमध्ये राहायला जावे लागते. या दिवसात पुरुषांच्या नजरेस पडणे ही पाप समजले जाते.

           मासिक पाळी संदर्भात अशा अनेक अनिष्ट प्रथा आपल्या समाजामध्ये रुढ आहेत. या प्रथांचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मासिक पाळी कडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. जर प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात केली तर, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रिया मासिक पाळीच्या काळात जो शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करतात तो थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल.

धनश्री कुंभार, पुणे


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय