(जालना):- जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वीच विवाह झाल्यानंतर मांडव परतनीसाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा एका माथेफिरू युवकाने चाकूने भोकसून खून केला. या घटनेने मंठा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नवविवाहितेचे जालना येथील एका युवकाशी पाच दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. मांडव परतनीसाठी ती माहेरी आली होती. दरम्यान, माहेरी आल्यानंतर ही नवविवाहिता व तिची मैत्रीण खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. खरेदी करून घरी परतत असताना एका युवकाने पाठीमागून येऊन तिच्या मानेवर व हातावर चाकूने वार केले त्यामुळे ती जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भर रस्त्यात विवाहितेचा खून झाल्याने मंठा परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर काही संघटनांकडून आज मंठा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.