राजूर : मुळा पाणलोट क्षेत्रात असलेल्या आंबित जलाशयाची दुरावस्था झाली असून या धरणात अनेक वर्षापासून गाळ साचला असल्याने मृत साठा कमी असून जलश्यात कमी क्षमतेने पाणीसाठा होत असल्याची ओरड कायम आहे. हे जलाशय दुर्लक्षित असल्याने या धरणाच्या पायथ्याजवळील काँक्रिट खराब होऊन मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असून १९३ दशलक्ष घनफुट क्षमतेचे आंबित धरण जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षाने शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे या जलाशयाकडे कुणी फिरकेनासे झाले आहे. जलश्यावरील लोखंडी दरवाजे गेट गंजून गेले असून बांधकामास छोटी मोठी छिद्रे दिसू लागली आहेत. तीन वर्षापूर्वी अतिवृष्टी झाल्याने जलाशयाच्या मागील डोंगर कोसळून तो जलाशयात येऊन पडल्याने जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे जलाशयाची क्षमता व मृत साठा यात तफावत दिसून येत आहे. शेवटचे आवर्तन सोडताना माती मिश्रित पाणी बाहेर पडले.
या धरणास लघु पाटबंधारे विभागाने काही कामे केली असल्याचे त्या विभागाचे म्हणणे आहे, मात्र लिकेज व भेगा याची कामे अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येते. हरिश्चंद्रगड व मुळा खोऱ्यात असलेल्या आंबित लघुपाटबंधारे प्रकल्पाची दुरवस्था झाली असून या प्रकल्पाचे काम पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाने तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येईल, असे कोणतेही काम अधिकाऱ्यांनी करू नये. या दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस सेलचे तालुकाअध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. बलठण व आंबित लघु पाटबंधारे प्रकल्पाला गळतीकडे ग्रामस्थांनीही याकडे लक्ष वेधले आहे.
यावर सुशिलकुमार चिखले यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांची राजूर निवासस्थानी भेट घेऊन लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नानोर व शाखा अभियंता अभिजित देशमुख यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेऊन गत वर्षी अगस्ती कारखान्याने या प्रकल्पाची दुरुस्ती केली होती. मात्र पावसाळा सुरु होण्यापूर्वीच या प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देणे क्रमप्राप्त असताना हे प्रस्तवाला विलंब होत असल्याचे डॉ किरण लहामटे साहेब म्हणाले.
किती दिवसात या दुरुस्तीचे काम होईल. मात्र, काम झाले नाही तर त्यास जबाबदार अधिकारी यांनी विचारून काम झाले नाही तर पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असेही सुनावले.