मुंबई : देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झालीय. मात्र, तरीही महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय. राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे.
देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केलाय. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.”
दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.