मंचर , (दि.१३) : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांवर सुद्धा उपचार होत आहेत. मात्र, या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची मंचर येथे राहण्याची सोय करावी. अशी मागणी आंबेगाव तालुक्याच्या अखिल भारतीय किसान सभेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत किसान सभेतर्फे तहसीलदार रमा जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष राजू घोडे , सचिव अशोक पेकारी, अविनाश गवारी आदी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अनेक गावे ही मंचर पासून सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतरावर आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी भागातील कोरोना रुग्णांसोबत नातेवाईक देखील येत आहेत. त्यांना एसटी व इतर वाहने बंद असल्याने मंचर येथेच मुक्काम करावा लागतो. येथे त्यांच्या निवासाची सोय नसल्याने मोकळ्या जागेत झोपावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातलगांच्या रात्रीचा मुक्काम करिता एखादी शासकीय इमारत किंवा काही खोल्या उपलब्ध करून दिल्यास त्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.