संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर (दि.६) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २३ गावांमधील १७५० कुटुंबातील ४४१३ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे गडहिंग्लज बाधित गावांची संख्या २, ५ कुटुंबातील २१ व्यक्ती, १४ जनावरे. पन्हाळा- बाधित २ गावातील ३ कुटुंबातील १४ व्यक्ती एका जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीर- ३ बाधित गावांमध्ये १६०३ कुटुंबातील ३८५० व्यक्ती आणि १०३८ जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहेत. गगनबावडा -बाधित ८ गावांमधील २१ कुटुंबातील ६८ व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे.
आजरा तालुक्यातील सुळेरानमधील १ कुटुंबातील ९ व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे. चंदगड- बाधित ६ गावातील ९७ कुटुंबातील ३७७ व्यक्ती ४७ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील २० कुटूंबातील ७४ नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अशा जिल्ह्यातील एकूण २३ गावांमधील १७५० कुटुंबातील ४४१३ व्यक्तींना आणि ११०० जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.