गुजरात : जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाची प्रतीक्षा लागली आहे. हा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (28 मे) खेळणे ठरले होते.मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा नियोजित सामना सोमवारी (29 मे) राखीव दिवशी खेळला जाईल.
आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन 7:30 वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सर्व खेळाडू व कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अकरा वाजेपर्यंत पाऊस न थांबल्याने अखेर सामना सोमवारी खेळण्याचे निश्चित करण्यात आले.
सोमवारी अहमदाबाद मधील वातावरण स्वच्छ राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना पूर्ण 40 षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. हा अंतिम सामना जिंकून गुजरात सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. तर, चेन्नईकडे पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.