इचलकरंजी : इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे हे अतिशय दानशूर,निर्मोही व राजस व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक शिक्षण संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना, उपक्रमांना सातत्यपूर्ण मदत केली होती. तोच वारसा श्रीमंत यशवंतराव घोरपडे पुढे नेत आहेत. तीनशेहून अधिक वर्षाचा संपन्न इतिहास असलेल्या श्रीमंत घोरपडे घराण्याने लोकसेवेचे केलेले काम फार मोठे आहे. इचलकरंजी आणि परिसराच्या जडणघडणीत राजघराण्याचे मौलिक स्वरूपाचे योगदान आहे.तीच दूरदृष्टी घेऊन श्रीमंत बाबासाहेब सहा – सात दशके कार्यरत राहिले असे मत श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
प्रारंभी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉ.आनंद कोळी यांच्या हस्ते श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या ‘ऑक्टोबर २०२०’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रसाद कुलकर्णी यांनी श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांच्याशी असलेले ऋणानुबंध आणि त्यांनी केलेले सहकार्य यांची कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तसेच मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
डॉ. आनंद कोळी म्हणाले, श्रीमंत आबासाहेब घोरपडे हे विविध सामाजिक कार्याला सातत्याने भरघोस मदत देऊनही प्रसिद्धीपासून दूर राहणारे एक राजस व्यक्तिमत्त्व होते. तर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणारे ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिक गेली एकतीस वर्षे ज्या सातत्याने लोकप्रबोधन करीत आहे ती भूषणावह गोष्ट आहे. डॉ. कोळी यांनी आपल्या मांडणीत श्रीमंत आबासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व, समाजवादी प्रबोधिनीचे कार्य, कोरोनाने निर्माण केलेली आव्हाने व आपण घ्यायची दक्षता आदींवर भाष्य केले.
यावेळी प्रा. रमेश लवटे, प्रकाश सुलतानपुरे, शिवाजी शिंदे,उमाकांत कोळेकर, नौशाद शेडबाळे, तेजस बुचडे, भीमराव नायकवडी, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हलभावी, अश्विनी कोळी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.