मुंबई : सध्या देशभर केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांना सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये “नीट राहा नाही तर गोळ्या घालीन” या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इतर दोघा जणांनी ती लाईक केली आहे. या तिघांपैकी दोन जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे अजित नवले यांनी म्हटले आहे.
उद्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणाऱ्या शक्तीच आज अशा धमक्या देत असल्याचे देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हंटले आहे.
तसेच, फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाईक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील माकपने केली आहे.
दरम्यान, नव्या कृषी कायद्याच्या विरोधात 23 जानेवारी ते 25 जानेवारीला अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई असा वाहन जथ्या काढण्यात आला होता. महाराष्ट्रात देखील शेतकरी आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात किसान सभेनेच पुढाकार घेतल्यामुळे डॉ. अजित नवले टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे.