Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावहिरडा नुकसान भरपाई विषयी झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणार – दिलीप वळसे...

हिरडा नुकसान भरपाई विषयी झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणार – दिलीप वळसे पाटील 

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील, आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेले व नगद रक्कम प्राप्त करून देणारे बाळहिरडा हे एकमेव साधन आहे. राज्यात, जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या, निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे, फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. 

विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

सदरील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.व नुकसान भरपाई विषयी अहवाल सादर करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

राज्य शासनाने हिरडा नुकसान भरपाई विषयी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्याचे सहकार मंत्री व आंबेगाव तालुक्याचे विधानसभा सदस्य दिलीप वळसे पाटील यांची किसान सभा व माकपच्या शिष्टमंडळांनी नुकतीच पुणे येथे भेट घेतली.

मार्च, 2023 रोजी नाशिक वरून मुंबईकडे निघालेला लॉंग मार्च व अकोले ते लोणी पायी मोर्चा या दोन्ही लाँग मार्च मध्ये हिरडा नुकसान भरपाई विषयी सकारात्मक निर्णय झाले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती. याच मागणीसाठी नुकतेच किसान सभेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालय, नाशिक येथे तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन सभेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांचे व किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांचे फोनवर संभाषण होवून, मंत्री महोदय अनिल पाटील यांनी यासंदर्भात सबंधित अधिकारी व संघटनेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक, दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे घेण्याचे मान्य केले आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी व हिरडा नुकसान भरपाई विषयी झालेल्या, निर्णयाची अंमलबजावणी होणेसाठी राज्यशासनाच्या वतीने नक्की सहकार्य केले जाईल असे आश्वासन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी माकपचे ज्येष्ठ नेते कॉ.प्रा.अजित अभ्यंकर, किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी इ.उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय