प्रतिनिधी :- जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे . निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज सध्याच घेता येणार नाही, असे महावितरणने म्हटले आहेे.
पुणे जिल्ह्यात सकाळपासून सुरु असलेल्या ‘ निसर्ग ‘ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, मावळ व खेड तालुक्यांमधील ३४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे . तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे विजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय झाडाच्या फांदया वीजवाहिन्यांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजतारा तुटल्याने वीजपुरठा खंडित झाल्याचे महावितरणने म्हटले आहे.