(बीड/प्रतिनिधी) जिल्हयात कोरोना विषाणूची लागण मोठया प्रमाणावर होत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यावर नियंत्रण राखण्याकरिता विवाह समारंभात आता फक्त १० लोकांच्या मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात येत असून सदरील ठिकाणी कोवीड विषयक सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या अटीवर विवाह सोहळ्यास परवानगी असेल असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी दिले आहेत.
प्रत्येक विवाह सोहळयाची माहिती लेखी स्वरुपात किमान तीन दिवस आधी आयोजकांनी संबंधित पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत, नगर परिषद/नगर पंचायत यांना लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे.
तसेच संबंधित विवाह सोहळ्यात सर्व कोवीड-१९ विषयक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी /ग्रामसेवक यांची राहील. यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाने यापूर्वी आदेशानुसार विवाह समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात देखील ५० लोकांसाठी सोशल डिस्टींगचे पालन करुन परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये आता बदल झाला आहे.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत,सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.