Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणआंबेगाव : आदिवासी कातकरी समाजाचे संविधानिक हक्कांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण...

आंबेगाव : आदिवासी कातकरी समाजाचे संविधानिक हक्कांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु

आंबेगाव (पुणे) : आमची ग्रामपंचायत कोणती ? असा सवाल करत अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी कातकरी समाजाने जुने आंबेगाव येथील कातकरी लोकवस्ती व घरांची नोंद ही लगतच्या ग्रामपंचायतमध्ये करण्यात यावी, या मागणीसाठी बोरघर (ता.आंबेगाव) येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

डिंभे धरण झाले, आंबेगाव विस्थापित झाले, शिल्लक राहिलेल्या क्षेत्रात वास्तव्यास राहिलेल्या कातकरी अदिवासी बांधवांना ग्रामपंचायत मात्र अद्यापही मिळाली नाही. मागील गेली १० वर्ष, लगतच्या  ग्रामपंचायतला हे शिल्लक क्षेत्र जोडण्यासाठी चा लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे, अशी माहिती किसान सभेने दिली.

डिंभे धरणाचे बुडीत क्षेत्र मधील संपादन होवून शिल्लक राहिलेले आंबेगावचे भौगोलिक क्षेत्र, तेथील लोकवस्ती यांचा लगतच्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यासाठी ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. सन २०११ च्या जनगणनेनुसार बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र सुमारे १० हेक्टरच्या आसपास आहे. व २६ निवासी घरे आहेत. याठिकाणी मुख्यत: आदिम जमाती कातकरी या समाजाचे वास्तव्य आहे. 

येथील उर्वरित क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे आदिम जमाती कातकरी यांना आदिवासी विकास विभागाकडून मिळालेली घरकुले यांची नोंदही होऊ शकली नाही तसेच कोणत्याही नागरी सुविधा त्यांना प्राप्त झालेल्या नाहीत. या अनुषंगाने ग्रामस्थ, शाश्वत संस्था व किसान सभा यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा या अगोदर केलेला होता. या सर्वांचा परिणाम म्हणून पंचायत समिती, आंबेगाव यांनी परिपूर्ण प्रस्ताव, पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून व आवश्यक त्या ठरावासह तो विभागीय आयुक्त, पुणे यांना 27 नोव्हेंबर 2017 रोजी सादर केला. विभागीय आयुक्त कार्यालयाने 20 डिसेंबर 2017 रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी ग्रामविकास विभाग मंत्रालयाचे सचिव यांच्याकडे पाठवला. 

त्यांनी सन 2018 ला काही त्रुटी काढून हा प्रस्ताव पुन्हा पाठवला होता. परंतु या त्रुटींची सन 2018 पासून जिल्हा प्रशासन यांनी कोणतीच पूर्तता केली नाही. त्यामुळे या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा व बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र लगतच्या ग्रामपंचायत जोडण्यात यावे  किंवा त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी मागणी किसान सभेने विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. व या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास 26 जानेवारी 2021 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

प्रशासनाने या प्रश्नाची सोडवणूक न केल्याने आज प्रजासत्ताक दिनी आंबेगाव मधील कातकरी आदीम जमातीचे बांधव आपल्या संविधानिक हक्कासाठी लढत आहेत. हा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तो पर्यंत अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ असे एकूण १० व्यक्ती हे बेमुदत उपोषण करतील. हा प्रश्न सुटण्यासाठी  शाश्वत संस्था व  सामाजिक कार्यकर्ते बुधाजी डामसे सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. या आंदोलनाला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), बिरसा ब्रिगेड या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय