सुरगाणा (दौलत चौधरी) : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या तोक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यात आंब्याच्या फळबागा, शेततळी, भाजीपाला भोपाळ्याच्या बागा, ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. चक्रीवादळाचा जोरदारपणे फटका बसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यातील आंबा उत्पादक पुरता हवालदिल झाला आहे. थोड्याफार प्रमाणात आंब्याच्या विक्रीतून खरीप हंगामातील बी बियाणे खरेदी केले जात असे. आंबा उत्पादनात केशर, हापुस, तोतापुरी, लंगडा, राजापुरी आदी समावेश आहे. पिंपळसोंड येथील शिवराम चौधरी, रतन खोटरे, मोतीराम चौधरी, रंगू चौधरी, भिंतघर येथील मेनाबाई जाधव, रघुनाथ जाधव, बन्सु कडाळी, तुळशीराम जाधव, झिमन चौधरी, उखराम कडाळी, बुधा जाधव, खोकरी येथील भास्कर धुम, जामुनमाथा यशवंत दळवी, मोतीराम दळवी, शंकर महाले जांभळपाडा येथील यशवंत दळवी, मोतीराम दळवी, निवृती गांगोडे, सावळीराम भोये, पळसन येथील रामचंद्र महाले, चिंचले येथील बाबुराव बागूल, मानी येथील लहानु सुकऱ्या गायकवाड, रामदास आबाजी महाले, मनखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी लहानू राऊत, जयराम कामडी यांच्या शेतातील भोपळ्याची बाग जमिनदोस्त होऊन साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिजुरपाडा येथील मनोहर भोये यांच्या शेतातील शेत तळ्यातील प्लास्टिक कागदाचे सुमारे तीन लाख किंमतीचा कागद फाटून नुकसान झाले आहे. यासह परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. कृषी विभागाने तात्काळ पाहणी करुन पंचनामे करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जाधव यांनी केली आहे.