पुणे : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राज्यात काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. गेल्या आठवड्यात १२ तासांच्या आत ३ भूकंप झाले होते. त्यातील २ भूकंप नाशिकमध्ये झाले असून १ भूकंप मुंबईत झाला होता.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. यानंतर गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवायला लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज एकापाठोपाठ चार धक्के बसले आहेत. पहाटे ३.३०, ३.४४, ३.५७ आणि ७.०६ वाजता असे हे धक्के बसले. या भूकंपामुळे डोंगरी आणि किनारपट्टी भाग हादरला असून मागील काही दिवसांपासून पालघरमध्ये सातत्यानं हादरे बसत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपाचे हादरे उत्तर मुंबईपर्यंतही जाणवले होते.
या भूकंपाचे हादरे जुन्नरच्या पश्चिम भागातील पठारावरील नागरिकांना जाणवले असल्याची चर्चा लोकांमध्ये होताना दिसते आहे. आंबे हातविज गावातील ग्रामस्थ अक्षय निर्मळ यांनी “महाराष्ट्र जनभूमी”ला सांगितले की, पहाटे ३.३० वाजता पलंग, कपाट अशा काही वस्तू हालत होत्या तसेच सौम्य भूकंपाचे हादरे जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारची चर्चा काही ठिकाणी होताना दिसत आहे.