नवी दिल्ली : 1 ऑगस्ट रोजी संपलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावापासून दूरसंचार कंपन्या पुढच्या पिढीच्या दूरसंचार सेवेची तयारी करत आहेत. नागरिकांना आता लवकरच 5G सेवा वापरायला मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. उद्योगानं 5G पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केलंय आणि 2-3 वर्षांत ते देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल. आम्ही उद्योगांना 5G शुल्क परवडणारे आणि प्रवेशयोग्य ठेवण्याची विनंती केलीय. आमचे मोबाईल सेवा शुल्क जगातील सर्वात कमी आहे. असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, भारतीयांना जागतिक दर्जाची 5G सेवेची सुविधा मिळणार आहे. 5G जलद गतीने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या अतिशय चांगल्या आणि पद्धतशीरपणे सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वी असे वृत्त होते की पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 च्या निमित्ताने ते 29 सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल.