मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा डीवायएफआयने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
डीवायएफआयने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने असा अचानक जाहीर केलेला निर्णय लाखो तरुणांच्या विरोधात जाणारा आहे आणि त्यांना नैराश्यात ढकलणारा आहे. आधीच ही परीक्षा कित्येक वेळा विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आली होती आणि आता कुठे एकदाची ही परीक्षा होणार हे निश्चित झाल्यानंतर लाखो तरुण दिवसरात्र एक करून अभ्यास करीत होते. असा अचानक झालेला आघात न सहन होणारा आहे. या अगोदरच्या फडणवीस सरकारने राज्यातील तरूणांच्या स्वप्नाशी खेळत घोर निराशा केली. नव्या सरकारकडे तरुणांच्या मोठ्या आशा होत्या. अशा प्रकारच्या निरनिराळ्या घटनांमुळे ती आशा लोप पावली आहे. तरुणांमध्ये रोजगाराला घेऊन मोठी निराशा तयार झाली असल्याचे डीवायएफआयने आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
देशात बेरोजगारी दिवसेन दिवस वाढत आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकार अथवा राज्य सरकार कोणत्याही प्रकारचे नियोजन किंवा प्रयत्न करताना दिसत नाही. आशा स्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करून बेरोजगार तरूणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तो असंतोष आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दिसून येत आहे. हजारो तरुण तरुणी परिक्षेचा अभ्यास करणारे त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. याचा विचार करून सरकारने तात्काळ हा निर्णय मागेे घ्यावा अशी संघटना मागणी डीवायएफआयने केली आहे.
पूर्व नियोजित तारखेनुसारच परीक्षा घ्याव्यात अन्यथा बेरोजगार तरुणांना रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडू नये डीवायएफआयचे राज्याध्यक्ष सुनील धनवा, राज्य सचिव प्रीती शेखर यांनी म्हटले आहे.