Monday, May 20, 2024
Homeराज्यअंतिम वर्षाच्या परीक्षांवरून विद्यार्थी संघटना आक्रमक ; घेतली न्यायालयात धाव

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून विद्यार्थी संघटना आक्रमक ; घेतली न्यायालयात धाव

 (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचा निर्णय अजूनही अनिश्चित असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी स्यू मोटो याचिका दाखल करून सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (MASU) केली आहे.

       महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना सहा पानी पत्र ईमेल केलं आहे. न्यायालयाने विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) देखील अंतिम वर्ष परीक्षांबाबत एक सामायिक निर्णय आल्यानंतरच परीक्षा घ्याव्यात, अशीही या संघटनेची मागणी आहे.

   महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘ जर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालाच तर विद्यार्थ्यांना काही गोष्टींची हमी मिळायलाच हवी. उदाहरणार्थ, विदयार्थी कोविडग्रस्त असल्याने परीक्षा देता आली नाही किंवा ते कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाही किंवा वाहतूक व्यवस्थेच्या तुटवड्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही तर त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा देण्याची संधी द्यायला हवी ‘, असं या पत्रात म्हटलं आहे.

  महाराष्ट्रा विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षा होणार नाहीत, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना कोरोना स्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा देता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः केली होती. मात्र याबाबत कोणताही लेखी शासन आदेश जारी करण्यात आलेला नाही. दुसरीकडे विद्यापीठांचे कुलपती म्हणजेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षानेही परीक्षा झाल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली आहे. या परीक्षेच्या पेचामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय