घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथे श्रावणी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आले होते. यावेळी भीमाशंकर येथे जात असताना त्यांना तळेघर याठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीच्या वतीने हिरडा प्रश्नाच्या अनुषंगाने स्मरणपत्र देण्यात आले. On behalf of the Kisan Sabha , a reminder was submitted to the Chief Minister on the issue of Bal Hirda
सन २०२३ मध्ये शेतकरी, आदिवासी समुदाय यांच्या विविध प्रश्नांविषयी नाशिक ते मुंबई व अकोले ते लोणी असे दोन लाॅग मार्च किसान सभेच्या वतीने काढण्यात आले होते.
या दोन्ही लॉग मार्च मध्ये सन 2020 मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात, बाळहिरड्यांची झालेली नुकसानभरपाई दिली जाईल व आदिवासी विकास महामंडळामार्फत बाळ हिरडा खरेदी करून बाळहिरड्याला हमीभाव देईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री व आदिवासी मंत्री आणि महसूल मंत्री यांनी दिले होते.
पण या आश्वासनाची पूर्तता अद्याप न झाल्याने किसान सभेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना आज थेट तळेघर येथे स्मरणपत्र देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील जनतेचे बाळहिरडा हे जगण्याचे प्रमुख साधन असून, नगद उत्पन्न मिळवून देणारे ते एकमेव माध्यम आहे. त्यामुळे हिरडा प्रश्नांची सोडवणूक करण्याठी किसान सभेच्या वतीने गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत.
जर, हे प्रश्न सुटले नाही तर किसान सभेच्या वतीने नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळ यांच्या कार्यालयासमोर ऑक्टोबर महिन्यात बेमुदत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे व याची माहिती प्रत्यक्ष मुख्यमंत्री यांना किसान सभेचे अशोक पेकारी व राजू घोडे यांनी यावेळी दिली.
सदरील प्रश्नांची सोडवणूक करणेसाठी नक्की लक्ष घालू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी नमूद केले.
यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजू घोडे, तसेच किसान सभेचे कार्यकर्ते व या भागातील ग्रामस्थ मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे, लखन पारधी, संदिप म्हस्कर, अनंता केंगले, निवृत्ती गवारी, भावेश काठे, निवृत्ती ईष्टे, बबन मावळे, प्रकाश वडेकर, साहिल केंगले इ. उपस्थित होते. तसेच या भागातील विविध गावचे, ग्रामस्थ व आजी- माजी सरपंच-उपसरपंच देखील उपस्थित होते.