Sunday, May 19, 2024
Homeराज्यकोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण - गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण – गृहमंत्री अनिल देशमुख

सांगली : पोलीस विभाग, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात अत्यंत चांगला समन्वय असून राज्यभर कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यात पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पोलीस दल अहोरात्र कष्ट घेत आहे, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने हळूहळू उद्योगधंदे गती घेत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वराज्यात व स्वगावी परत गेलेले मजूर, श्रमीक पुन्हा कामासाठी महाराष्ट्रात  येत आहेत. त्यामुळे स्थानीक यंत्रणांवर पुन्हा ताण वाढणार आहे. त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन काटेकोर पध्दतीने व्हावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ८१ कंटेनमेंट झोन सुरू असून ग्रामीण भागात ६८, शहरी भागात ८, मनपा भागात ५ कंटेनमेंट झोन सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यात ३३९ कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण झाले असून यापैकी २२१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १०६ रूग्ण रूग्णालयात उपचाराखाली आहेत तर १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ९ हजार १८५ थ्रोट स्वॅब तपासण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १३ ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असून यामध्ये ४४१ व्यक्ती आहेत तर २२४ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत. ३८ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश आहे. रूग्ण दुप्पटीचा दर २७.८ तर जिल्ह्यात मृत्यू दर ३.१ आहे. अशी माहिती यंत्रणांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी यावेळी जिल्ह्यात कोविड अनुषंगाने तपासणी सुविधा चांगली असून पीपीई किट अन्य संरक्षक सामग्री पुरेशा प्रमाणात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ वृध्दी करण्यात आले असून यामाध्यमातून आयुष मेडिकल अधिकारी व स्टाफ नर्स उपलब्ध झाल्या आहेत. 

तसेच कम्युनिटी हेल्थ अधिकाऱ्यांचाही चांगला उपयोग होत आहे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यरत झाले असून ज्या ठिकाणी आयसीयु सुविधा निर्माण केल्या आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजीनेशन सुविधाही जोडण्यात आल्या आहेत. रूग्ण संख्या वाढल्यास बेडची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती तजवीज केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर करताना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सांगली जिल्ह्यात आंतरराज्य सीमा चेकपोस्ट एकूण ११ असून आंतरजिल्हा सीमा चेकपोस्ट २१ आहेत. या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. लॉकडाऊनचे यशस्वी पालन व्हावे यासाठी २५ मार्च पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सुविधा देण्याचा उपक्रम जिल्हा पोलीस दलाने सुरू केला. तर जिल्ह्यात ५२ पोलीस पथकांमार्फत जनजागृतीचे समुपदेशनाचे कार्य करण्यात येत आहे. स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या स्वगावी पाठविण्यामध्येही पोलीस विभागाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ५५ वर्षावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी त्यांना जनसंपर्क होणारे कर्तव्य  न देता फक्त कार्यालयीन काम देण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येत असून त्यासाठी मोबाईल पोलीस फिवर क्लिनीक सुर करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ५०९ प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय