Tuesday, May 7, 2024
Homeकृषीनाशिक ते मुंबई वाहन मार्च : लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच; १५...

नाशिक ते मुंबई वाहन मार्च : लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच; १५ हजार शेतकऱ्यांचा भव्य मार्च

नाशिक : केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी वाहन मार्च सुरू केला. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी आज (दि. 23 जाने) सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला.

 

त्यापूर्वी झालेल्या जाहीर सभेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जमसंच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, माकपचे आमदार व सीटूचे राज्य सचिव विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, डीवायएफआयच्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर आणि एसएफआयच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे यांनी संबोधित केले.

 

नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च आज इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल. येथे राज्यातून अजून मोठ्या संख्येने शेतकरी सामील होणार आहेत. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घाटनदेवी येथून निघून हे हजारो शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे 24 जानेवारी रोजी सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा 24 जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.

 

राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

 

दिनांक 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे, डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. 

सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

 

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

 

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय