औरंगाबाद :- उमेदवारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता घेउन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या( एमपीएससी) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .मात्र पुणे,मुंबई,औरंगाबाद,नागपूर अश्या मोठ्या शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे .त्यामुळे आयोगाने केंद बदलून द्यावे किंवा परिक्षा पुढे ढकलावी,अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाची १३ सप्टेंबर तर ११ ऑक्टोबर ला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले सध्या कोरोनामुळे आपापल्या घरी आहेत,सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना येण्याआधी परीक्षेचा अर्ज भरला आहे.बहुतांश मुले ही पुणे,मुंबई या ठिकाणी वास्तव्यास होती.त्याच ठिकाणी त्यांनी आपला परीक्षेचे केंद्र निवडले आहे.राज्यसेवेची परिक्षा ही पूर्ण दिवसभर चालणारी परीक्षा आहे.त्यामुळे किमान एक दिवस अगोदर केंद्राच्या ठिकाणी यावे लागणार आहे.त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे .वैयक्तिक वाहन करून येण्याइतपत प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसेल. विद्यार्थ्यांनी होस्टेलच्या खोल्या सोडल्यामुळे राहण्याची व्यवस्था होणे खूप जिकरीचे आहे.परीक्षा केंद्रावरती कसे जायचे,कुठे रहायचं,परीक्षा दिल्यानंतर गावातील लोक कोरोनामुळे आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतील या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलणे किंवा केंद्र बदलून देण्यात यावे जेणे करून हजारो परीक्षार्थींची होणारी धावपळ थांबवली जाईल.
शिवाय अश्या काळात एमपीएससी च्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे होय .त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र बदलावे किंवा परीक्षा पुढे ढकल्याव्या अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने केली आहे.निवेदनावरती एसएफआय चे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष लोकेश कांबळे,सत्यजित मस्के,मोनाली अवसरमल, भगवान श्रावणे आदी.च्या स्वाक्षऱ्या आहेत.