शहापूर (प्रतिनिधी) – आदिवासी वनाधिकाराच्या दावे व पाणीसाठे असलेल्या धरण बाधित शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याचे पाणी मिळण्यासंदर्भात विधानसभेत जोरदार आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी शहापूर तालुक्याच्या तानसा परिसरात माकप व किसान सभेतर्फे विजय दिनी सभेत ते बोलत होते.
२८ वर्षांपूर्वी २४ जून १९९२ रोजी फॉरेस्ट अधिकारी आणि पोलिसांनी येथील जमिनी कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांवर दहशत बसवून त्यांना हाकलून देण्यासाठी अमानुष गोळीबार केला होता. त्यात कॉ. रघुनाथ भुरभुरा यांच्या छातीतून आरपार गोळी गेली, पण त्यांना पक्षाने लगेच मुंबईच्या जे. जे. इस्पितळात नेऊन त्यांचे प्राण वाचवले. इतरही अनेक जण या गोळीबारात जखमी झाले. पण आदिवासी शेतकऱ्यांनी तरीही मागे न हटता जोरदार प्रतिकार केला आणि जुलमी पोलीस व फॉरेस्ट अधिकाऱ्यांना पळवून लावले. आज २८ वर्षांनंतरही येथील ०८ गावांच्या जमिनी टिकवून शेकडों आदिवासी शेती करत आहेत, आणि ते कसत असलेल्या जमिनींच्या मालकीहक्कासाठी वनाधिकार कायद्याखाली त्यांनी दावे केले आहेत. या लढ्याचा विजय दिवस या भागात दरवर्षी २४ जूनला वेगवेगळ्या गावांत सभा घेऊन साजरा केला जातो. “जंगलतोड आम्ही करणार नाही, फॉरेस्ट प्लॉट आम्ही सोडणार नाही ” हा त्या लढ्याचा वारसा आजच्या परिस्थितीत वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुढे नेण्याची हाक या सभेत देण्यात आली.
शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा, मोडकसागर असे महाराष्ट्रातील सर्वात प्रचंड पाणीसाठे आहेत, पण ह्याच तालुक्यातील असंख्य गावांना शेतीचे सोडाच, पण पिण्याचेही पाणी मिळत नाही, हा प्रश्न अग्रक्रमाने घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माकपचे नेते डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, बारक्या मांगात, आमदार विनोद निकोले, सुनीता शिंगडा, प्रकाश चौधरी, विजय विशे, भरत वळंबा, सुनील करपट, नितीन काकरा यांनी संबोधित केले. भास्कर म्हसे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश बोचल यांनी प्रास्ताविक तर राजेंद्र भवर यांनी आभार व्यक्त केले.