Sunday, May 12, 2024
Homeग्रामीणएसएफआयने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देताच मन्यारवाडी-आंबेसावळी बस सेवा सुरू

एसएफआयने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देताच मन्यारवाडी-आंबेसावळी बस सेवा सुरू

बीड (ता.३१) : गेल्या काही वर्षांपासून मन्यारवाडी-आंबेसावळी ही बस सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आणि नागरिकांना प्रवासासाठी त्रास होत होता. म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या वतीने ही बस सेवा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी २२ ऑक्टोबर रोजी बीड बस नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले होते. बससेवा सुरू न केल्यास विद्यार्थी आणि नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा एसएफआयने या निवेदनात दिला होता. अखेर बस प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून बससेवा सुरू झाली आहे. 

बीड तालुक्यातील मन्यारवाडी आणि आंबेसावळी या गावात गेल्या कित्येक वर्षापासून बस सेवा बंद होती. म्हणून कित्येक विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत होते. विद्यार्थी आणि नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. म्हणून ही बाब लक्षात येताच एसएफआयने बीड येथील विभागीय नियंत्रक कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. या सगळ्या बसच्या गैरसोयींमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहतात ही सगळी गैरसोय थांबली पाहिजे आणि तात्काळ बससेवा सुरू झाली पाहिजे अशी भूमिका एसएफआयने घेतली होती. जर तात्काळ बस सेवा सुरु केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. यासंदर्भात विभागीय नियंत्रक अधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली. डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटेल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळ व विद्यार्थ्यांना दिले होते. याची बस प्रशासनाने दखल घेऊन ही बससेवा सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. निवेदनाची दखल घेऊन बससेवा सुरू केल्याबद्दल एसएफआयने बस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

बससेवा सुरू करण्यासाठी निवेदन करणारे एसएफआयचे जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका सचिव आणि जिल्हा कमिटी सदस्य अभिषेक शिंदे, तालुका कमिटी सदस्य निखिल शिंदे, आनंद भालेराव, किशोर शिंदे, व्यंकटेश गुंदेकर आदींचे परिसरातील विद्यार्थी व नागरीक अभिनंदन करत आहेत. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय