Friday, May 10, 2024
Homeराज्यलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष

मुंबई :- लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती घेतल्यास त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्यांचे सर्व साहित्य तळगाळातील ‘नाही रे’ वर्गाला, महिला अन् दलित, आदिवासींना प्रेरणा देणारे आहे. अशा या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एकमताने संमत केला आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा, या मागणीसाठी पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कानगो आणि राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. शाहीर अमरशेख व शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला होता. साहित्याच्या क्षेत्रात अण्णाभाऊंनी जवळपास ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, ३ नाटके, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे, १ प्रवासवर्णन आणि कितीतरी शाहीरी कवने लिहून एक वेगळाच इतिहास घडविला आहे. त्यांच्या कादबंरी लेखनावर ७ मराठी चित्रपटही निघाले आहेत. शिक्षणाची परंपरा नसलेल्या, आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मातंग समाजातील अण्णाभाऊंनी आपल्या भोवतालच्या अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या सामर्थ्यावर दिलेले समाजासाठीचे योगदान लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या १०१ व्या जयंती वर्षात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने संमत केला आहे. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्यावतीने केंद्राकडे याबाबत खंबीरपणे शिफारस करावी, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकावर पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, कॉ. नामदेव गावडे, सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. राजू देसले, कॉ. प्रा. राम बाहेती, कॉ. स्मिता पानसरे, सूकुमार दामले यांच्या सह्या आहेत.नाशिक जिल्ह्यात भाकप व आयटक तसेच किसान सभा यांच्या वतीने यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असा निर्णय भाकप राज्य सचिव मंडळ नेते कॉम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रसंगी कॉम्रेड महादेव खुडे, भास्कर शिंदे, दत्तू तुपे ,मुर्तुज अन्सारी, ऍड. दत्तात्रय गांगुर्डे, शिवाजी पगारे, नामदेव राक्षे, किरण डावखर, डॉ. रामदास भोंग, विराज देवांग, संगीता उदमले, सुनीता कुलकर्णी, राजू नाईक, समीर शिंदे ,विजय दराडे, देवीदास बोपळे, ऍड. साधना गायकवाड, प्रा के एन अहिरे आदी नि घेतला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय