वाशीम : वाशीम तालुयातील काजळांबा येथील शेतकरी कुटूंबातील मनीषा उगले (वय २०) हिची पहिल्याच प्रयत्नात ‘इंडियन नेव्ही’ मध्ये निवड झाली असून, यामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शेतकरी सधन असो की, अल्पभूधारक शेवटी तो शेतकरी आणि त्याच्या नशिबी अठरा विश्व दारिद्रयच. असे असतांना कबाडकष्ट व रक्ताचे पाणी करुन तो आपल्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी धडपडतो. आज घडीला सैनिक सेवेत महिलांचा टक्का हा बोटावर मोजण्या इतकाच आहे. त्यात महिलांसाठी हे सैनिक क्षेत्र एक आव्हानच. मात्र, तालुयातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले हीने काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनाशी ठेवली आणि त्यासाठी तिचे वडिल राजकुमार उगले यांनी जीवाचे रान करीत आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला सर्वतोपरी सहकार्य केले.
मनीषाने देखील आपले व वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. ‘इंडियन नेव्ही’ साठी मुंबई येथेतिने प्रथम अर्ज केला आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाली. मैदानी चाचणीतही यश संपादन केले. ‘इंडियन नेव्ही’ मध्ये निवड होण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिने प्रशिक्षण पूर्ण केले. वडील राजकुमार उगले हे शेतकरी असून, त्यांनी केवळ शेतीच्या भरोशावर दोन मुली व मुलाला देखील उच्च शिक्षण दिले. त्यात मनीषा ही ‘इंडियन नेव्ही’ मध्ये अग्नीवर म्हणून देशाची सेवा करणार आहे.