नाशिक : आश्रमशाळा चिंचला येथील विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रामपंचायत गोदुंणे च्या माध्यमातून परिसरात वनराई बंधारे बांधत सामाजिक बांधिलकी जपली.
अति डोंगराळ भाग, भरपूर पाऊस. मात्र, साठा नसल्याने संपूर्ण पाणी गुजरात राज्यात वाहून जाते. त्यासाठी वाहत जाणारे शेवटचे पाणी, शेवटची धार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी अडवून छोटे-छोटे बंधारे बांधले. पाणी जमिनी जिरवण्याचा प्रयत्न केला. यातून शेतकऱ्यांचे विस्कळलेले जीवन काही अंशी सुधारण्यास मदत होणार असून यातून शेतकरी आपल्या पिकांना जीवदान देतील. शिवाय गाई-गुरे यांनाही त्याचा फायदा होणार आहे.
परिसरामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कार्याचे लोक कौतुक करीत आहेत. यासाठी ग्रामपंचायत गोदुंणे च्या सरपंच श्रीमती संध्याताई खंबाईत, उपसरपंच कमलेश राऊत यांचे विशेष सहकार्य मिळाले. आश्रमशाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बंधारा बांधण्यास विद्यार्थ्यांना मदत केली. तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून जेसीपी व इतर साधनांची उपलब्धता करून दिली.