चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने जबरदस्त विजय मिळवल्यानंतर राज्यात सरकार स्थापन केले आहे. देशाच्या राजकारणात अवघ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत दोन राज्यात सत्ता मिळवण्यात आम आदमी पक्षाला यश आलं आहे.
पंजाबमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या पहिल्याच बैठकीत पंजाबमधील बेरोजगारी संपवण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी मोठी घोषणा केली आहे.
शनिवारी नव्या मंत्र्यांसोबतच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी महिन्याभरात २५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये १० हजार पदे पोलीस विभागातील तर १५ हजार पदे अन्य शासकीय विभागातील असणार आहे. तसेच, या भरतीमध्ये मंडळ आणि महामंडळ विभागाची पदेही भरली जाणार असून राज्याचे नवे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chaired the first cabinet meeting. The Punjab cabinet has approved notification of 25,000 job vacancies within one month.
As we promised before the election, jobs opportunities for our Punjab’s youth will be the topmost priority of AAP Govt.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 19, 2022
दरम्यान, आम आदमी पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यात पंजाबमधील बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परिणामी आपल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.