शहापूर (प्रतिनिधी) :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरीत द्या, स्वधार योजनतेतील रक्कम त्वरित खात्यावर जमा करा आदी मागण्यांना घेऊनआंदोलन करण्यात आले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरी देखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून एसएफआयने आज १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली होती. या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन मागणी केली.
एसएफआयने १८ एप्रिल आणि २५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले होते. परंतु अजूनही शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. मागील शैक्षणिक वर्ष २०१९-२० संपले असूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण न होणे, हे सामाजिक न्याय विभागाच्या ढिसाळ नियोजनाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे दिलासा देणारी बाब आहे. म्हणून किमान या संकटाच्या काळात तरी सरकारने शिष्यवृत्तीचे वेळेत वाटप करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. म्हणून एसएफआयच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
उद्या दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनात एसएफआय चे राज्य कमिटी सदस्य व ठाणे-पालघर जिल्हा सचिव भास्कर म्हसे, शुभांगी वळंबा, ज्योती पाचलकर, करण वळंबा, हवशिराम आढल आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.