Sunday, May 19, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार कोसळले ;काँग्रेसला बसला मोठा धक्का

मोठी बातमी : पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार कोसळले ;काँग्रेसला बसला मोठा धक्का

 

पुद्दुचेरी : पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सरकार कोसळलं आहे. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही. नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. दरम्यान व्ही. नारायणसामी यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच पुदुच्चेरीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावली होती.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे.

 

मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असं म्हटलं आहे. “आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल,” अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.

“पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण सत्याचाच विजय होईल,” असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता.  

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय