भीमाशंकर (दि.१४) : तळेघर (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश बिरारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा काळात तळेकर पंचक्रोशीतील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी भागातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून या परिसरातील सुमारे १५ ते २० गावांना या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होत आहे; परंतु या केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश बिरारी वारंवार गैरहजर राहणे व उशीरायेणे, निवासी न थांबणे, लोकांशी उद्धटपणे वागणे याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून किसान सभेच्या वतीने काही दिवसांपूर्वी या डॉक्टरांवर कारवाई करावी, याबाबत आंदोलनही करण्यात आले होते. तसेच या भागातील ३ रुग्णांच्या मृत्यूस ते जबाबदार आहेत.याबाबत नियुक्त केलेल्या चौकशी समितीने त्यांना दोषी ठरविले आहे.
डॉ.बिरारी शंभर ते दीडशे रुग्णांना कोरोना काळात तीन ते चार तास वाट पाहण्यात लावत आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियमित व वेळेत असावेत, डॉ. जयेश बिरारी यांच्यावर कारवाई करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर अंतर्गत असलेली उपकेंद्रे नेहमी चालू असावीत, जांभोरी येथील आरोग्य केंद्रात नियुक्तीवर असणारे डॉ.शिंदे मागील एक महिन्यापासून हजर नाहीत .तेही उपकेंद्रात हजर असावेत आदी मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर येथे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहंडूळे,चंद्रकांत उगले,अशोक पेकारी मारुती केंगले, विजय आढारी,नंदाताई मोरमारे, कृष्णा वडेकर,रामदास लोहकरे आदी उपस्थित होते.