मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांचे पैसे अर्णब गोस्वामी यांनी थकवले असल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा ‘रिपब्लिक भारत’ कडून करण्यात आला आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचा सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.