Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हाबैलगाडा शर्यतीमुळे पुन्हा ग्रामीण संस्कृती, अर्थकारणाला चालना मिळेल; लोकप्रतिनिधी, गाडा मालक यांच्या...

बैलगाडा शर्यतीमुळे पुन्हा ग्रामीण संस्कृती, अर्थकारणाला चालना मिळेल; लोकप्रतिनिधी, गाडा मालक यांच्या प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पिंपरी चिंचवड सह खेडमधील शेतकरी आनंदीत झाले आहेत. शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शर्यतीमुळे खिलार गोवंशाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण अर्थकारणाला पूरक असा हा निर्णय आहे.

या निर्णयावर माजी महापौर व चिखली चे नगरसेवक राहुल जाधव म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत होत आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची, त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चारशे वर्षांपासून आहे.शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता. पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले. आणि शेतकऱ्याच्या दावणीला दिसणारी बैलजोडी फक्त चित्रातच दिसू लागली.

महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल. भोसरी, हवेली ला बैलगाडा शर्यतीची ऐतिहासिक परंपरा आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे मी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने आणि तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने स्वागत करतो, असेही जाधव म्हणाल्या.

तर चिखलीच्या नगरसेविका अश्विनीताई जाधव, “मी बैलगाडा मालकाची सून आहे. महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदीमूळे देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. सात वर्षे शर्यत बंदी मुळे बैलांच्या संख्येत व किमतीत होणारी घट तसेच शर्यती चे साहित्य तयार करणारे ग्रामीण कारागीर, शर्यती उपयोगी साहित्य तसेच तसेच वाहतूक व्यवस्थेचे सहित सर्वांचेच शर्यत बंदी मुळे कंबरडे मोडले आहे.”

शेतकरी आणि कामगार नेते विष्णुपंत नेवाळे म्हणाले, “ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे स्वागत! पुन्हा शर्यती सुरू होतील. बैलाच्या सजवण्याच्या वस्तू तयार करून विक्री करणाऱ्या कारागिरांना चांगले दिवस येतील. शर्यतीच्या निमित्तानं लावली जात असलेली छोटी-मोठी दुकानं, बैलांना सजवण्याच्या वस्तू विकणारे व्यापारी, शेतीपयोगी वस्तू विकणारे, चहा-पाण्याची हॉटेल्स चालणारे लोक, बैलांच्या धावपट्ट्या तयार करणारे, बैलांच वाहतूक करणारे, वाजंत्री, आताच्या काळात डीजेवाले, चारा विकरणारे, असे छोटे-मोठे प्रत्येक व्यावसायिक या शर्यतीच्या अवतीभोवती जोडले जातात. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल ही प्रत्येकासाठी मोलाची ठरते. मोठ्या शेतकऱ्यांकडे असलेला आर्थिक प्रवाह गरीब कामकरी लोकांकडेही यानिमित्ता प्रवाहीत होतो.”

खेड तालुक्यातील मोई गावचे माजी सरपंच जीवन येळवंडे म्हणाले, “आमदार महेशदादा लांडगे यांनी सुरवातीपासून न्यायालयीन लढ्यासाठी बैलगाडा मालकांना एकत्र केले, कायदेशीर लढाई जिकल्याचा आनंद होतोय. बैलगाडा शर्यतीचे आवडीमुळे देशी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो. बैलांचे संगोपनाबाबत शासन स्तरावर आजपर्यंत कोणतीही योजना प्रस्तावित नाही. बैलांच्या प्रदर्शन व शर्यत बंदी मुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली होती. शर्यत बंदी मुळे देशी गाय-बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्याने जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यत बंदी मुळे शेतकर्‍यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होण्याची वेळ आली होती. पुण्याच्या ग्रामीण भागात शेतकरी आनंदी झाले आहेत.”

चऱ्होली येथील बैलगाडा मालक ज्ञानेश्वर बुर्डे म्हणाले, “ग्रामीण भागातील यात्रा, उरूस यामध्ये बैलांच्या शर्यती हे मुख्य आकर्षण असते. कोट्यावधी रुपयांची व्यापारी उलाढाल पंचक्रोशीत होत असते. भेळपुरीवाल्यापासून ते कापड विक्रेत्यापर्यंत हा व्यापार गेली अनेक शतके सुरू आहे. आता रुबाबदार खिल्लार जनावरांचा वंश टिकेल. भोसरी हवेलीची परंपरा न्यायालयाच्या निर्णयामुळे वृद्धिंगत होईल.”

– क्रांतिकुमार कडुलकर 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय