Sunday, May 19, 2024
Homeकृषीविशेष : आजी सोबत राबली पोरं, मनरेगामुळे पिकली बोरं...

विशेष : आजी सोबत राबली पोरं, मनरेगामुळे पिकली बोरं…

नंदुरबार : विमलताई पाटील यांचे वय अधिक असले तरी त्या थकलेल्या नाहीत. अजूनही शेतकामात लक्ष घालतात. शेती विषयी भरभरून बोलतात. कापूस लावून फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी बागेसाठी कष्ट घेतले आणि अधिक उत्पन्न देणारी ॲपल बोरांची बाग शेतात उभी राहिली आहे.

विमलबाईंच्या नावे नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात 2 हेक्टरचे क्षेत्र आहे. आतापर्यंत संपूर्ण शेतात कापूस लावला जाई. अधिक कष्ट घेऊनही उत्पन्न मात्र मर्यादित होते. निसर्गाने साथ दिलीच तर 40 हजारापर्यंत उत्पन्न येई. उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च आणि कष्ट अधिक होते. त्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या शेतातील 1 हेक्टर क्षेत्रात त्यांनी ॲपल बोराची लागवड केली. पहिल्या वर्षी आलेला बहार काढून टाकला. दुसऱ्या वर्षापासूनच त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली. गतवर्षी 60 हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यासोबत अकुशल मजूरीचे 68 हजार रुपये आणि रोपांसाठी 17 हजार रुपये देखील मनरेगाच्या माध्यमातून मिळाले आहेत. यावर्षी पावसामुळे पीकाचे नुकसान झाले असले तरी  साधारण 55 क्विंटल बोरे सुरत आणि पुण्यातील व्यापाऱ्यांनी नेली आहेत.

आजींनी शेतात मनरेगातून गांडूळ खताची टाकी तयार करून घेतली आहे. त्यासाठी 5800 रुपये मजूरीचे मिळाले. साधारण 6000 रुपये किंमत असलेले गांडुळखत शेतासाठी अवघ्या काही महिन्यात उपलब्ध झाले आहे. योजनेतून शेतात सिंचन विहिर तयार करण्यात आली असून पाईपलाईनद्वारे पाणी शेतात आणले आहे. विहिरीसाठी 1 लाख 96 हजार अकुशल कामासाठी  आणि 83 हजार कुशल कामासाठी खर्च मनरेगामधून देण्यात आले.

फळबाग लागवड फायदेशीर ठरत असल्याने यावर्षी बांधावर 20 आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यासाठीदेखील योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. फळबाग लागवड केल्यानंतर आंतरपिकदेखील घेता येत असल्याने उत्पन्न वाढण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. यावर्षी मुगाचे उत्पादन घेणार असल्याचे विमलताईंनी सांगितले.

फळबागेला केवळ गांडुळ आणि शेणखत आवश्यक असल्याने खर्च कमी होतो. कुटुंबातील सदस्य बोरांची तोडणी व इतर कामे करीत असल्याने मजूरीचा खर्चदेखील वाचतो. हा खर्च इतर क्षेत्रावरील पिकांसाठी करता येतो. आजींना त्यांचा मुलगा दिलबर मदत करतो. गेली 30 वर्षे त्या शेतात काम करीत आहेत. अनेक वर्षाच्या अनुभव असल्याने फळबाग लागवडीने झालेला फायदा त्यांना लक्षात आला आहे. शेतातील 400 रोपांची आता छाटणी होऊन आंतरपीक घेतले जाईल आणि पुढच्या मोसमात परत एकदा बहरलेली फळबाग अधिक उत्पन्न देईल असा विश्वासही त्यांना आहे.

आजींचे बहरलेले शेत पाहून परिसरातील इतरही शेतकरी फळबागे विषयी जाणून घेण्यासाठी शेताला भेट देत आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने 70 पेक्षा अधिक फळबाग घेण्याचे नियोजन आहे. तांत्रिक सहायक संदिप वाडिले आणि ग्रामरोजगार सेवक शरद पाटील यांचे मार्गदर्शन असल्याने योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढते आहे. विमलताईंच्या शेतात यशस्वी ठरलेली फळबाग लागवड इतरांनाही प्रोत्साहन देणारी ठरली आहे.

 

विमलताई पाटील-कापसाचे उत्पादन घेताना अधिक खर्च करूनही मजूर मिळत नाही. याउलट फळबागेसाठी मजूरांची आवश्यकता नाही, फवारणी  लागत नाही. मजूरीमुळे पैसे घरातच रहातात. कापसावर अधिक खर्च करण्यापेक्षा फळबागेचे क्षेत्र वाढविल्याने पावसाचे संकट येऊनही अधिक फायदा झाला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय