जालना : जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यात सुरू असलेल्या मराठा मोर्चावर पोलिसांनी लाठिचार्ज केल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूरांचाही वापर केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जालन्यातील सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम होते.
दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे.