Monday, May 6, 2024
HomeNewsकांतारा चित्रपट म्हणजे मानव आणि निसर्ग यामधील संघर्ष !

कांतारा चित्रपट म्हणजे मानव आणि निसर्ग यामधील संघर्ष !

कांतारा सिनेमाबद्दल कसल्याही चर्चा अद्यापही आपल्याकडे पसरल्या नसून जसं ‘तुंबाड’च्या वेळी झालेलं ना सिनेमा आल्यानंतर माऊथ पब्लिसिटी झाली आणि सिनेमा जबरदस्त स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करून गेला. अगदी तसंच ‘तुंबाड’ आणि ‘कांतारा’ या दोन्ही सिनेमाच्या तुलनेवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जोर दिला. याचं कारण तुम्हाला ‘कांतारा’ सिनेमा पाहिल्यावर कळेलच.

‘ऋषभ शेट्टी’ (Rishab Shetty) हे नाव मला तरी अपरिचित होतं. प्रभास, धनुष सोबत कित्येक स्टार्सने ‘कांतारा’ सिनेमाचं कौतुक करताचं माझी नजर पडली ती अंगावर शहारे आणणाऱ्या ‘कांतरा’ सिनेमाच्या ट्रेलरवर… अफाट, एकदम भारतीय धाटणीचा पारंपरिक टच, भय, अॅक्शनचा तडका, चित्रीकरण, सिनेमाचा रंग आणि संगीत, कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाची झलक पाहिल्यावर हा सिनेमा पाहायची उत्सुकता लागलेली. ‘कांतारा’ हिंदी भाषेत येतोय हे समजल्यावर तर अधिकच आनंद झाला.

सिनेमा खतरनाक आहे हे ट्रेलर बघूनच लक्षात आलं होतं. पण पिक्चर अभी बाकी थी… सिनेमाचं कथानक असं आहे की,”हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीचा पालनकर्ता मानलं जातं, भागवतपुराणात लिहलंय की, धर्माच्या रक्षणासाठी विष्णू देवांनी सतयुग ते कलियुगात घेतलेले अवतार हे ‘दशावतार’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकी तिसरा अवतार म्हणजेच ‘वराह’. ही कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील वन आणि आदिवासी गावकरींची देवता दाखवली आहे. शिवाय सिनेमाचं कथानक घनदाट जंगलात फिरत राहतं. ‘भूत कोला’ नृत्य नर्तक कलाकार म्हणजेच ‘कोला’. द्वारपाल म्हणून हे भगवान ‘वराह’च्या सर्व भक्तांचं प्रत्येक वाईट आत्म्यांपासून एकवचनी रक्षण पूर्वापार प्रथेप्रमाणे करत आल्याचे पाहायला मिळते.

त्यामागची पारंपरिक कथा सिनेमात जलदगतीने दाखवण्यात आली आहे. प्राचीन काळात एका राजाने सुख शांतीच्या शोधात देवदेवतांशी एक वचन करार केलेला असतो. यात राजाच्या राज्यात असलेल्या जंगल वनांची जमीन तिथे राहणाऱ्या आदिवासी गावकऱ्यांना दिलेली असते. ज्या वचनाचं पालन त्या राजाची पुढील पिढी आणि त्या गावचे आदिवासी लोकं करत आलेली पाहायला मिळतं. सोबतच मानवाच्या लोकांच्या भौतिक सुखांच्या लालसा, लोभ, वासनेपोटी उल्लंघन होऊ नये यासाठी लेखकाने ‘दक्षिण कन्नड’ या गावात काल्पनिक कांतारा, कांबळा ही भूत कोलाची संस्कृती पिढ्यानपिढ्या जपत आलेली पाहायला मिळते.
लालसे पोटी जो राजाची पुढील पिढीतील जमीनदार वचन तोडायला पाहतो त्याचा मृत्यू हमखास ठरलेला असे.

आपल्याकडे जसं आपण म्हणतो दैवी शक्ती ‘अंगात येणं’ किंवा अगदी आपला ‘बिरसा मुंडा’ यांनी जसं आदिवासी समाज एकत्र करून वाईट वृत्ती विरोधात उभे राहिले होते. तसंच काहीसं मिळतं जुळतं कथानक असलेलं कर्नाटकाचे पारंपरिक ‘कोला’ हे लोकनृत्य कलाकार त्यांच्या नृत्य प्रकारामधून देवतांच्या जवळ असलेले पाहायला मिळतात.

सिनेमाच्या मध्यापर्यंत सिनेमा संथगतीने पुढं जाताना दिसतो. अगदी ‘कोला’ नृत्यप्रकार, हॉरर प्रसंग, पार्श्वसंगीत आणि अगदी सुरवातीला दाखवलेली म्हशींची शर्यतीच्या उत्तम चित्रीकरणामुळे सिनेमॅटोग्राफरची कमाल अगदी पैसा वसूल फिल देऊन जाते. त्यानंतर सिनेमा जो काही सुसाट वळण घेतो तो अगदी शेवटपर्यंत त्याला तोडच नाही..

आदिवासी गावकरी, लालसा असलेली त्याच राजाची पुढील पिढी म्हणजे ‘देवेंद्र’ जमीनदाराच्या भूमिका साकारलेले अभिनेते अच्युत कुमार (Achyuth Kumar). कथानकाच्या मध्यात शासकीय वन विभागाचे वन अधिकारी मुरलीधर म्हणजेच अभिनेते ‘किशोर (Kishore) यांची एन्ट्री होते. तो मला हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन; (Dwayne Johnson) सारखा भासला.

सिनेमाचा मुख्य दुवा ‘शिव’ म्हणजेच ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ड्रॅमॅटिक ऍक्शन, रोमान्स, साहस. जंगलातील दैवी शक्तीच्या जोडीला निसर्ग विरुद्ध वाईट वृत्तीचा संघर्ष ऋषभ शेट्टीने प्रभावीपणे मांडलेला दिसून येतो. ‘शिव’ आणि वन अधिकारी यांचे उडणारे खटके, जमीनदारांनी आपल्या फायद्यासाठी खेळलेली चाल आणि शिवा ची प्रेयसी ‘लीला’ म्हणजेच सप्तमी गौडा (Sapthami Gowda) जी नुकतीच वन विभागात नोकरीला लागलेली असते. या दोघांची ‘प्रेम की नैय्या राम के भरोसे’ सुरू असते.

सिनेमाचं कथानक अगदी सुरुवातीपासूनच आपलं मन गुंतवून ठेवतं. जोडीला असलेलं पार्श्वसंगीत, साहसी दृष्य, सिनेमॅटोग्राफी, जंगल, आदिवासी संस्कृती उत्तम गुंफलेली पाहायला मिळेल. उलगडत जाणाऱ्या सिनेमाच्या कथासह, सिनेमातील अनेक छोट्या गोष्टींसोबत दिग्दर्शक आणि सिनेमामध्ये काम केलेल्या प्रत्येकाच्या मेहनतीचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

पटकथा पाहताना काहींना ‘तुंबाड’ (Tumbbad) आठवला. जो निसर्ग आणि मानवाचा हव्यास यांचा संघर्ष एक धडा देऊन जातो हे लक्षात येतं. ‘तुंबाड’ सारखे थरारक सिनेमे हे भारतीय सिनेमा जगतात माईल्डस्टोन ठरणारे आहेत. अशा सिनेमांचे तुम्ही चाहते असाल तर ‘कांतारा’ सिनेमा पाहायला नक्की जावं. सिनेमाने 100 कोटींची कमाई केली असून हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जनमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तर, IMDb वरही सिनेमाने जादू दाखवली आहे. या सिनेमाला 9.4 रेटिंग मिळाले आहे.

हळूहळू चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचू लागला आहेच… मात्र दिग्दर्शक ऋषभने ज्या प्रकारे निसर्गाच्या पालनकर्ता असलेल्या तिथल्या आदिवासी नागरिकांची संस्कृती त्याच जोडीला वन विभागाचं कार्य आणि जमिनी हडप करणारी जमिनदारांची लालसी वृत्ती, नकळतपणे विचारात पडणारा जबराट कॉन्टेन्ट दिवाळीच्या आधी आलेला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिट साऊथ सिनेमांच्या यादीत आता ‘कांतारा’चं नाव नक्कीच जोडलं जाणार आहे यात शंकाच नाही.

या सिनेमाला आम्ही देतोय पाच स्टार..आजच जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय