14 हजार शेतकरी 1200 ट्रॅक्टर,200 कार,10 मिनी बसेसचा वापर
नवी दिल्ली:दि.२१-शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीतील वार्ता निष्फळ ठरल्यानंतर आंदोलकांनी ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहनांसह दिल्लीच्या दिशेने कुच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला. या घटनेत 20 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत.पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्स तोडण्यासाठी हे शेतकरी निघाले होते.
जखमीपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी आंदोलकांपैकी 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर इतरांवर शंभू येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार करण्यात आले.जखमींपैकी 3 शेतकऱ्यांना पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरचे सिव्हिल सर्जन डॉ कृपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला राजींद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे बंद केले.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पंजाब-हरियाणाच्या सिंधू सीमेवर साधारण 14 हजार शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी साधारण 1200 ट्रॅक्टर,200 कार,10 मिनी बसेसचा वापर करत आहेत.
दरम्यान अश्रुधुराच्या कांड्या पासून बचाव करण्यासाठी गॉगल व मास्क शेतकरी वापरत आहेत,तसेच रबर गोळ्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी पोकलेन मशीनच्या केबिनला जाड स्वरुपातील लोखंडी पत्रे जोडलेली जोडण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टरमध्येही शेतकऱ्यांनी बदल केले आहेत,अशी माहिती उपलब्ध झाली आहे.