मुंबई : आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणी ईडीने सकाळीच छापेमारी केली आहे. एक दोन नव्हे तर बारामती अॅग्रोच्या सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
बारामती अॅग्रोवरच्या सहा ठिकाणी एकाचवेळी सकाळी 8 वाजता ही छापेमारी करण्यात आली. सात तास झाले तरी अजूनही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीत झाडाझडती सुरू आहे. पुणे, बारामती, पिंपळी आणि संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक विभागाने रोहित पवार यांच्याविरोधात कारवाई केली होती. प्रदूषण नियंत्रक विभागाने बारामती अॅग्रो कंपनीला 72 तासात प्लान्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. पण याप्रकरणी रोहित पवारांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली होती.
महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे. रोहित पवार हे परदेशात गेलेले आहेत. ते परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली आहे.
या छापेमारीवर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडिया वर म्हटले आहे, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.