केंद्र सरकारने 13 राज्यांच्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांचे फेरबदल केले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. दरम्यान काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे कोश्यारी वादात सापडले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.
दरम्यान लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचाही राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. Koshyari resignation त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे मजबूत नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.