Saturday, May 18, 2024
HomeNewsशास्तीकर माफीचा आदेश लवकरच काढणार, पिंपरी ते निगडी मेट्रोलाही मंजुरी देणार-...

शास्तीकर माफीचा आदेश लवकरच काढणार, पिंपरी ते निगडी मेट्रोलाही मंजुरी देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

शहरातील एकही प्रकल्प प्रलंबीत राहणार नाही

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि. २२ –
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे.
तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल.तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लावणार आहे. तसेच पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. या शहरातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही ही जबाबदारी माझी असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) केली. माझ्या मुख्यमंत्री होण्यात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचाही सिंहाचा वाटा, हिस्सा, सहभाग, प्रेम होते, अशा भावना व्यक्त करून पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप,शिवसेना,रिपब्लिकन पक्ष (आठवले गट),रासप,रयत क्रांती संघटना,शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे कर्तव्यदक्ष व जागरूक आमदार होते. त्यांनी केलेले काम येथे बोलते. त्यांच्या निधनानंतर मी अंत्यदर्शनासाठी आलो होतो. त्यावेळी हजारो लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्याच घरातील कोणी गेल्याचे दुःख दिसत होते. त्यांची किर्ती, त्यांचे काम सभेला असलेल्या जनतेच्या उपस्थितीवरून जाणवते. हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यांच्या हातून काही विकासकामे शिल्लक राहिली असतील. ती पूर्ण करण्यासाठी जनतेने त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मागे उभे राहावे. त्यांचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला साथ देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

भाजप-शिवसनेचे सरकार स्थापन होण्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आजारी असताना देखील दिवंगत लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईत आले होते. त्यातून पक्षावरील प्रेम, निष्ठा, जबाबदारी त्यांनी निभावली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर व प्रेम आहे. पण अशी वेळ येईल असे कुणालाही वाटले नव्हते. नियतीसमोर आपण सगळे हतबल असतो. त्यांनी अनेक वर्षे चिंचवड मतदारसंघाची सेवा केली. लोकांना प्रेम दिले. कार्यकर्ते आणि मतदारांना स्वतःचा परिवार समजला. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पोटनिवडणुकीत मतदारांचा आशिर्वाद घ्यायला उभ्या आहेत.

ही निवडणूक बिनविरोध होईल असे आम्हाला वाटलेले. मुंबईतल्या पोटनिवडणुकीत अनेक नेत्यांनी आवाहन केले. विनंती केली होती. महाराष्ट्राचीही परंपरा सांगितली होती. स्वतः शरद पवार बोलले. राज ठाकरे यांनीही विनंती केली.मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की निवडणूक लढवायला नको. त्यानंतर भाजपने भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीतही आम्ही सर्वांना बिनविरोध करण्याचे आवाहन व विनंती केली होती. ज्यांच्या विनंती मान देऊन भाजप-शिवसेनेने भरलेली उमेदवारी माघारी घेतली त्यांनी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, या पोटनिवडणुकीत मतदारसंघातील मतदारांचा कल अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने आहे. त्या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय