मुंबई (प्रतिनिधी):-
यंदाचा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात गुरुवारी मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या. गणेश मंडळांनीही यासाठी तयारी दर्शवली असून राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नाही असं आश्वासन दिलं.
दरम्यान सरकारचा निर्णय येण्याआधीच अनेक मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आगमन सोहळेही रद्द केले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणेश मंडळाने आगमन सोहळा रद्द केला असून मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.