बोगस प्रतिनिधीमुळे रिक्षा आंदोलनास गालबोट लागल्याचा आरोप
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कायदेशीर मार्गाने लढा उभारून देखील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी प्रशासन देखील सहकार्य करत असते. आंदोलन करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी रिक्षा चालकांनी घेतली पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतची आहे. तसेच रिक्षांची तोडफोड, संप करण्यासाठी जबरदस्ती करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये, अशी भूमिका संघटनेने सातत्याने मांडली आहे. शहरातील नागरिकांनी देखील संघटनेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र काही बोगस प्रतिनिधींनी रिक्षा संघटनांमध्ये प्रवेश करून आंदोलन भरकटवले असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
काही राजकीय पक्ष देखील स्वतःचा राजकीय स्वार्थ बघण्यासाठी रिक्षा चालकांना वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी रिक्षा बंदची हाक दिली होती. रिक्षा चालकांच्या हितासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले.
बोगस प्रतिनिधींच्या चिथावणी मूळे हिंसक कारवाया घडल्या आणि रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.मी कायदेशीर मार्गाने लढा देऊन प्रश्न सोडवू या माझ्या भूमिकेमुळे माझी वैयक्तिक बदनामी केली जात असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला आहे.