मुंबई (ता.२८) : आज रविवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी मुंबई येथील आझाद मैदानात किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये माय-बापाच्या लढाईसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या नेतृत्वात राज्यभरातील विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मागील एका वर्षापासून दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि या प्रदीर्घ आंदोलनाला मिळालेल्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांना घेऊन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र च्यावतीने ही महापंचायत आझाद मैदानात आयोजित करण्यात आली होती.
या महापंचायतीला यशस्वी करण्यासाठी एसएफआय एक विद्यार्थी संघटना म्हणून, आपल्या शेतकरी माय-बापासाठी यामध्ये सहभागी झाली होती. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थी या महापंचायतमध्ये उपस्थित होते. आझाद मैदानात एसएफआयने शेतकरी आंदोलनाप्रति एकता दर्शवली.
यामध्ये एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष कविता वरे, राज्य सहसचिव सुहास झोडगे व मल्लेशम कारमपुरी, राज्य सचिवमंडळ सदस्य विलास साबळे, पूजा कांबळे, राज्य कमिटी सदस्य भास्कर म्हसे, विलास भुयाळ, सायली अवघडे, स्टालिन आडे, राहुल जाधव, तुळशीराम गळवे आदी सहभागी झाले होते.